ACHARYA ATRE - BARA GAVCHE PANI by BABURAO KANADE
आचार्य अत्रे आणि विविध गावं यांच्या नात्याचा वेध... आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. साहित्य, नाटक, चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व, राजकारण, शिक्षण, समाजकारण आदी विविध पैलूंद्वारे त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. महाराष्ट्राच ‘सांस्कृतिक राजदूत’ अशीच त्यांची ओळख होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन, व्याख्यानं, चित्रीकरण, नाटकांचे दौरे आदी कारणांमुळे पायाला भिंगरी लावल्यासारखा त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. इतकंच काय; पण देश-परदेशांतही ते अनेकदा गेले. या निमित्त त्यांचा विविध शहरांशी-गावांशी संबंध आला. त्यातून त्यांचे अनेक ठिकाणांशी ऋणानुबंध जुळले. नेमक्या या नात्यांचा वेध अॅड बाबुराव कानडे यांनी ‘आचार्य अत्रे - बारा गावचं पाणी’ या पुस्तकांद्वारे घेतला आहे. बेळगाव, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा, वाई, तुळजापूर, पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली आदी शहरांशी आचार्य अत्रे यांचे नातेसंबंध यात उलगडून दाखवण्यात आले आहेत. ‘बेळगाव - महाराष्ट्राचे हृदय’ या लेखात बेळगावविषयी वाटणारी आत्मियता आणि जिव्हाळा आहे. सन १९४६ मध्ये तिथं झालेल्या साहित्य संमेलनाद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं रणशिंग अत्रे यांनी फुंकलं. ‘बेळगाव महाराष्ट्राचे हृदय आहे आणि मुंबई मस्तक आहे,’ असं म्हणत एखाद्या शूर शिलेदारासारखं लेखणी आणि वाणीद्वारे आचार्य अत्रे यांनी केलेल्या रोमहर्षक लढ्याचं वर्णन यात आहे. महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव म्हणून गोव्याला ओळखलं जातं. गोव्यावर अत्रे यांचं नि:स्सीम प्रेम होतं. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्रे यांनी उडी घेतली. त्यासाठी त्यांची लेखणी ‘नवयुग’मधून आग ओकत होती. त्यांच्या वाणीला धार चढली होती. गोव्यासंबंधीच्या त्यांच्या भाषणांचा आणि लेखांचा एक मोठा ग्रंथ होईल, एवढं त्यांचं योगदान आहे. या साऱ्या बाबी गोव्यावरच्या लेखात आहेत. पुण्याविषयी अत्रे यांना मोठी आत्मीयता होती. नगरसेवकपदापासून ते लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुका अत्रे पुण्यात लढले. भांबुर्डाचं शिवाजीनगर तर रे मार्केटचे महात्मा फुले मार्केट असं नामकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभेची निवडणूक पुण्यात ते हरले. त्याचवेळी विधनसभेची निवडणूक ते मुंबईतून जिंकले. त्यावेळी ‘आईने मारले; पण मावशीने तारले’ असे उद्गार त्यांनी काढले होते. पुण्याविषयी अशा अनेक आठवणी ‘पुणे- माझी आई - सांस्कृतिक कर्मभूमी’ या लेखात जागवल्या आहेत. आचार्य अत्रे यांचं कोल्हापूरशी नातं चित्रपटांमुळे आणखी दृढ झालं. ‘ब्रह्मचारी’, ‘वसंतसेना’, ‘महात्मा फुले’ या चित्रपटांसंदर्भातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. तसंच बाबुराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, बाबा कदम, शिवाजी सावंत आदींविषयीच्या आठवणींनाही उजाळा ‘कोल्हापूर नव्हे कलापूर’ या लेखात देण्यात आला आहे. सासवडमध्ये अत्रे यांचं बालपण गेलं. त्यावेळच्या अनेक आठवणी, गंमतीजमती आहेत. उनाडक्या, चेष्टा, चकाट्या, नकला यांना ऊत आला होता. त्यावर ‘शक्ती आणि भक्तीचा संगम - सासवड जन्मभूमी’ या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘मी लहानसहान मंडळींशी मैत्री करत नसतो. खंडाळ्यांच्या डोंगर आणि मुंबईचा सागर हीच माझी खरी मित्रमंडळी,’ असं आचार्य अत्रे म्हणत. त्यामुळंच खंडाळा इथला राजमाची बंगला हे त्यांचं एक आवडतं ठिकाण होतं. इथं रंगलेल्या मैफली, नवोदित साहित्यकांचा मेळा, मान्यवरांच्या गाठीभेटी यामुळं हा बंगला अत्रे यांच्या जीवनात उत्साहाचा झरा होता. एका बंगल्याविषयीच्या आठवणी खूप रंजक झाल्या आहेत. आचार्य अत्रे यांचे अभ्यासक अशी अॅड. कानडे यांची ओळख आहे. खरं तर आचार्य अत्रे यांना ते आपलं दैवतच मानतात. त्याच अनुषंगानं त्यांनी हा लेखनप्रपंच केला आहे. अत्रे यांचा अनेक गावांशी - शहरांशी ऋणानुबंध जुळला. तिथल्या आठवणींना कानडे यांनी एका धाग्यात गुंफलं आहे, हा अतिशय स्तुत्य प्रयोग आहे. खरं तर ही गावंच आचार्य अत्रे यांच्या आठवणी सांगत आहेत, असा भास आपल्याला होतो, इतकं प्रत्ययकारी लेखन कानडे यांनी केलं आहे. मात्र, हे करत असताना आचार्य अत्रे यांच्याशी ज्यांचे वादविवाद झाले, त्यांनाही कानडे यांनी झोडपून काढलं आहे. अत्रे यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलं असल्यामुळं हे झालं असावं, असं वाटतं. मात्र, त्यांनी हे टाळायला हवं होतं, असं वाटतं. अत्रे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी तर हे पुस्तक वाचावंच, शिवाय ज्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ, संयुक्त महाराष्ट्र यांविषयी यांविषयी आत्मियता आहे, त्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या पुस्तकातून निश्चित होते, एवढं नक्की!